२००० साली डिगामामांनी कर्जमुक्त केलेला आणि नंतर गर्तेत गेलेला आदिनाथ पुन्हा सुरळीत करण्याची कुवत फक्त संजयमामातच : चंद्रकांत सरडे
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- आदिनाथ सहकारी साखर कारखाना २००० साली तत्कालीन आमदार,माजी मंत्री स्व.दिगंबरराव बागल यांनी पूर्णपणे कर्जमुक्त केलेला आदिनाथ हा कोणाच्या करणीमुळे पुन्हा गर्तेत गेला हे जगजाहीर आहे आणि सद्यस्थितीत हा कारखाना पुन्हा सुरळीत करण्याची कुवत फक्त माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेच आहे असे ठोस प्रतिपादन महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार,आदिनाथचे माजी व्हा. चेअरमन चंद्रकांत सरडे यांनी साडे येथील महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या साडे येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना केले.यावेळी पुढे बोलताना सरडे म्हणाले की,
सन २००० साली कर्जमुक्त झालेला आदिनाथ हा सभासदांच्या दुर्दैवाने २००१ च्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या माजी आमदार रावसाहेब पाटील,गोविंदबापू पाटील,बाळासाहेब खताळ आदी मंडळींच्या ताब्यात गेला. मात्र या पॅनलचे नेते असलेल्या जगताप यांचा सहकारी संस्था मतदारसंघातून झरे येथील ज्येष्ठ नेते,माजी उपसभापती विलासराव पाटील यांनी दारुण पराभव केला ,मात्र असे झाले तरी जगताप हे नेते असल्याने त्यांच्या आदेशानुसारच कारखान्याचे कामकाज सुरू होते.सुरुवातीला रावसाहेब पाटील यांना दोन वर्षे चेअरमन करण्यात आले त्यावेळी कारखाना सुरळीत चालला,त्यानंतर पुढील दोन वर्षे गोविंदबापू पाटलांना चेअरमन करण्यात आलं त्यावेळच्या हंगामात आदिनाथला ऊस घालू नका हा जयवंतरावांचा मेसेज हस्ते-परहस्ते व्हायरल झाल्याने त्यावेळी अवघे ५५ हजार टन गाळप झालं आणि तिथपासून आदिनाथचे बुरे दिन सुरू झाले आणि पुढील काळात जी वाताहात झाली त्याचे संपूर्ण पाप हे जयवंतराव आणि नारायण पाटील यांचं आहे. कारण २००१ ते २००६ या दरम्यान आदिनाथवर सत्ता असल्याचा सर्वाधिक गैरफायदा नारायण पाटलांनी घेतला हे लक्षात घेऊन आदिनाथच्या हितासाठी या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलला पराभूत करा असे आवाहन यावेळी सरडे यांनी केले.
यावेळी समाधान दोंड,राजाभाऊ बाबर,निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर,मकाईचे माजी संचालक विवेक येवले, विलासकाका राऊत,भाजपचे गणेश चिवटे आदींची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर पॅनलचे प्रमुख,केम ऊस उत्पादक गटातील उमेदवार माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेसह पॅनलचे सर्व उमेदवार,भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,आदिनाथचे माजी चेअरमन वामनराव बदे,साडे येथील ज्येष्ठ नेते माजी उपसभापती गोकुळबापू पाटील,नेरलेचे सरपंच समाधान दोंड,आदिनाथचे माजी संचालक घोटीचे ज्येष्ठ नेते विलासकाका राऊत,बाबुराव गावडे आदींसह तालुक्यातील या पॅनलचे सर्व समर्थक कार्यकर्ते,मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या