सध्याच्या भयंकर दुष्काळी स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी : गणेश चिवटे यांनी केली केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे केली मागणी
करमाळा :- सध्याच्या भयंकर अशा दुष्काळी स्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भरीव व भरघोस मदत करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे केली आहे.आज केंद्रीय पथक करमाळा येथे दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी तालुक्यातील वरकुटे,नेर्ले,घोटी तसेच सालसे येथील गावामध्ये दुष्काळी स्थितीची पाहणी केली.
पथकाने यावेळी कोरड्या विहिरी,पाणी नसल्याने कोरडे पडलेले तलाव, कोमेजलेली-करपलेली पिके,गुरे -जनावरे चाऱ्याची स्थिती याची पाहणी केली याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली.यावर्षीचा खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरे व माणसे जगवण्याचे मोठे संकट आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठ्या भरीव मदत करण्याची गरज आहे याकडे श्री चिवटे यांनी पथकाचे लक्ष वेधले.जनावराच्या चारा छावण्या, लोकांच्या हाताला काम व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करणे गरजेचं आहे तसेच करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याने दुष्काळी योजना व सर्व प्रकरच्या सवलती शेतकरी व नागरिकांना लागू कराव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय पथकात केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लगार श्री.मुरलीधरन,केंद्रीय सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सरोजनी रावत यासह माढा विभागाच्या प्रांतधिकारी प्रियंका आंबेकर,करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे,गटविकास अधिकारी देविदास सारंगधर,तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी,पत्रकार बांधव उपस्थित होते.